logo

विना परवाना, विना चिमणी; यवतमाळ जिल्ह्यात अवैध विटभट्टींचा धुमाकूळ!

प्रेरणापुंज/यवतमाळ:- जिल्ह्यातील शेतजमिनींच्या मातीतून रोज लाखो विटा आकार घेत आहेत, मात्र या प्रक्रियेमध्ये पर्यावरणाच्या नाशाला तसेच शासन नियमांची पायमल्ली होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नियमबाह्य व प्रदूषणास पोषक ठरणाऱ्या विटभट्यांवर प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने या व्यवसायाचा बेकायदेशीर गाडा खुलेआम सुरू असल्याची तक्रार मनविसेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांनी केली आहे.

जिल्ह्यात सध्या २०० हून अधिक विटभट्या कार्यरत असून त्यापैकी अनेकांच्या नावावर कुठलाही परवाना नाही. या भट्टींमध्ये वापरण्यात येणाऱ्या मातीचे उत्खनन विनापरवाना होत असून, शासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान केले जात आहे. विशेष म्हणजे या भट्टींमध्ये नियमबाह्य इंधनाचा वापर सुरू असून चिमणी न वापरता कार्बन उत्सर्जन खुलेआम वातावरणात फेकले जात आहे.

नानवटकर यांनी याआधी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिनांक २५ मार्च २०२५ रोजी निवेदन दिले होते. त्यानंतर पुन्हा १५ एप्रिलला स्मरणपत्र देण्यात आले, मात्र कारवाई झाली नाही. विभागीय आयुक्त अमरावती यांनाही ७ मे रोजी निवेदन देण्यात आले. त्यावरून जिल्हा खनिकर्म विभागाकडून सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना पत्रही देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सरकारने विटभट्टींकरिता २०१६ पासून स्पष्ट नियम जारी केले आहेत. त्यामध्ये भट्टींचे स्थान, चिमणीची उंची, वापरण्यात येणारे इंधन, प्रदूषण नियंत्रण सुविधा आदींचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. २०२२ मध्ये केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार झिग-झॅग तंत्रज्ञान, उभ्या शाफ्ट किंवा नॅचरल गॅसचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यात हे नियम धाब्यावर बसवले जात असून, स्थानिक प्रशासन व महसूल विभागातील काही कर्मचारी भट्टीचालकांकडून चिरीमिरी घेत असल्याची शंकाही व्यक्त करण्यात येत आहे.

“तालुक्यात कोणत्याही भट्टीवर चिमणी दिसत नाही, मग प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवाने दिले तरी कसे? आणि विना परवाना भट्टी चालवत असल्यास तहसीलदार व महसूल अधिकारी कारवाई का करत नाहीत?” असा थेट सवाल मनविसेने उपस्थित केला आहे.

या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी यावर तातडीने लक्ष घालून सर्व अवैध विटभट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर , मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कठाळे , मनसे शहर अध्यक्ष अमित बदनोरे, साईराम कवडे, प्रथमेश पाटील, सोनू गुप्ता, अमितेश आडे,दर्शन नानवरे,कुणाल चव्हाण,तुशाल चोंढके , यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते

आता या तक्रारीची प्रशासन दखल घेते की यालाही दुर्लक्ष केले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

1
873 views