logo

मुंबई-गोवा महामार्गावरील विघ्न कायम ! यंदाही कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास खड्ड्यांतूनच होणार?

प्रतिनिधी. अनिकेत मेस्त्री

माणगाव । मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन माणगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. यापूर्वीही 'नेमेचि येतो पावसाळा' या उक्तीप्रमाणे 'नेमेचि येतो पाहणी दौरा' अशी परिस्थिती या महामार्गाची झाली आहे. मात्र अद्यापही महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. आता पावसाळा सुरु झाल्याने, हे काम पूण होईल अशी काही सुतराम शक्यत नाही. त्यामुळे यावर्षीही कोकणातील गणेशभक्तांना वाहतूक कोंडीबरोबर खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार, अशीच परिस्थिती आहे.

माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत माणगाव आणि इंदापूर येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांसाठी सुमारे १८ कोटी तातडीने देण्यात येतील असे आश्वासन दिले. मात्र हे रस्ते पावसाळ्यात होणार नाहीत. माणगाव आणि इंदापूर बायपासबद्दल त्यांनी ठोस मार्ग काढलेला नाही. त्यामुळे गणेशभक्तांना यावर्षीही हालअपेष्टा सोसत, खड्डे सहन करीत आणि वाहतूक कोंडीचा सामना करीत जीव मुठीत धरुन गणेशोत्सवाला कोकणात जावे लागणार आहे.

रायगड जिल्ह्यात नागोठणे,कोलाड,रातबड, कळमजे माणगाव, लोणेरे येथील पूलांची बांधकामे अजूनही सुरूच आहेत. पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. १४ वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गामुळे कोकणवासियांना अनेक समस्यांचा आणि संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेक सरकारांनी आणि मंत्र्यांनी आश्वासने दिली, पण परिस्थितीत बदल झालेला नाही. न्यायालयानेही या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव, निष्क्रीय प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार यामुळे गेल्या १४ वर्षात मुंबई-गोवा महामार्गाची मृत्यूचा महामार्ग अशी ओळख निर्माण झाली. माणगाव ते इंदापूरदरम्यान तासन्तास होणाऱ्या कोंडीतून तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परंतु मंत्र्यांनी दिलेल्या या सूचना पाळून कोंडी फोडण्याची इच्छाशक्ती गेल्या अनेक वर्षांत प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांना दाखवता आलेली नाही.
तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यापासून ते रविंद्र चव्हाणांपर्यंत अनेकांनी नवनवीन डेडलाईन दिल्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पदरात कोकणातील जनतेने वेळोवेळी मतांचे दान टाकले; पण कोकणवासियांच्या पदरात
आतापर्यंत आश्वासनापलिकडे काहीच पडलेले नाही. देशभर रस्त्यांचे जाळे विणणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही यासंदर्भात आपण कमी पडल्याचे मान्य करावे लागले.

पनवेल ते झाराप दरम्यानच्या महामार्गात पनवेल ते माणगावदरम्यानचा प्रवास हा सर्वात कळीचा मुद्दा बनला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न हा आर्थिक चणचणीचा नाही, तर तो राजकीय इच्छाशक्तीचा आहे. इच्छाशक्तीच्या अभावामुळे काम अपूर्ण असताना टोल सुरू करण्याचे धाडस अल्पकाळ का होईना महामार्गांची जबाबदारी असणाऱ्या कंपन्या करु शकल्या. आता रखडलेल्या महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे शिवधनुष्य उपमुख्यंमत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी उचलले आहे. त्याच्या कार्यकुशलतेतून गणेशोत्सवापर्यंत हा महामार्ग पूर्ण व्हावा. नवनव्या डेडलाईनची सवय झालेल्या कोकणवासियांवर आणखी एका डेडलाईनची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

15
1702 views