स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन रखडले
नांदेड, दि. 19 : किनवट तालुक्यातील 201 स्वस्त धान्य दुकानदार गेल्या सहा महिन्यांपासून कमिशनच्या प्रतीक्षेत असून, त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर कमिशन न मिळाल्याने दुकान चालविण्याचा खर्च, वीजबिल आणि इतर खर्च भागवणे अवघड झाले आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत नागरिकांना दरमहा धान्य वाटप करण्याचे काम हे दुकानदार पार पाडतात. त्यासाठी शासनाकडून प्रत्येक क्विंटल मागे 150 रुपये कमिशन मिळते. यापूर्वी दर तीन महिन्यांनी हे कमिशन मिळायचे. मात्र, सध्या जानेवारीपासूनचे कमिशन रखडल्याने दुकानदार नाराज आहेत.दुकानदारांना धान्यवाटपाचे 100 टक्के उद्दिष्ट दिले जाते. मात्र, काम पूर्ण करूनही त्यांचेच देयक रखडले जात असल्याने असंतोष व्यक्त होत आहे. कमिशनशिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत. या संदर्भात शासन दरबारी अनेक वेळा निवेदने देऊनही अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याचे रेशन दुकानदार संघटनेचे म्हणणे आहे. शासनाने त्वरित लक्ष देऊन रखडलेले कमिशन अदा करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे."कमिशन रखडल्याने रेशन दुकानदारांची उपजीविकाच अडचणीत आली आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याचा फटका थेट आम्हा दुकानदारांना बसत आहे," अशी प्रतिक्रिया नांदेड जिल्हा रेशन व केरोसीन दुकानदार महामंडळाचे महासचिव मिलिंद सर्पे यांनी दिली.