logo

आमदार डॉ. आशिष राव देशमुख यांच्यामार्फत शेतकऱ्यांना झटका मशीनचे वाटप

नागपूर जिल्हा प्रतिनिधी चंदू मडावी
मिळालेल्या माहितीनुसार
• शेतकऱ्यांच्या पिकांचे होणार संरक्षण.


खापा वनपरिक्षेत्राअंतर्गत ग्राम खुबाळा, रिसाळा व उमरी जांभळापाणी येथील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वनालगत शेती असलेल्या शेतक-यांना सौर उर्जा वन्यजीव प्रतिबंधक कुंपणाचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्यामार्फत १७ जूनला उमरी जांभळापाणी येथे वाटप करण्यात आले.

खापा वनपरिक्षेत्र वनविभाग, नागपूर अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वनालगत असलेली गावे खुबाळा, रिसाळा व उमरी जांभळापाणी या गावांची डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेकरीता निवड करण्यात आलेली असून त्यामाध्यमातून गाव विकास समिती तयार करण्यात आली.

सदर योजनेतील प्राप्त अनुदानातून वनपरिक्षेत्र खापा व गाव विकास समिती खुबाळा, रिसाळा व उमरी जांभळापाणी यांच्या संयुक्त विदयमाने ज्या शेतक-यांची शेती पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लगत आहे व जेथे वन्यप्राण्याचा वावर जास्त आहे तसेच वन्यप्राण्यांव्दारे शेतपिक नुकसानीच्या घटना होतात, अशा शेतक-यांची निवड करण्यात आली. त्यापैकी प्राप्त अनुदानानुसार खुबाळा गावातील १४५ लाभार्थी, रिसाळा गावातील ९० व उमरी जांभळापाणी गावातील ७५ शेतक-यांची निवड करण्यात आली असून एकूण ३१० लाभार्थ्यांची सौर उर्जा वन्यजीव प्रतिबंधक कुंपणाकरिता निवड करण्यात आली असून दिनांक १७/०६/२०२५ रोजी आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या हस्ते उमरी जांभळापाणी येथे वनपरिक्षेत्र खापा व ग्राम विकास समिती खुबाळा, रिसाळा व उमरी जांभळापाणी याच्या संयुक्त विदयमानाने तीन्ही गावातील लाभार्थ्यांना सौर उर्जा विदयुत कुंपण वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या हस्ते या गावांतील लाभार्थ्यांना सौर उर्जा विदयुत कुंपण वितरीत करण्यात आले.

कार्यक्रमात आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, वन्य प्राण्यांमुळे शेतपिकाचे नुकसान होत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला या सौर ऊर्जा कुंपणाचा (विद्युत झटका) लाभ मिळेल. मी स्वतः शेतकरी आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांना किती संकटांना सामोरे जावे लागते, याची कल्पना आहे. काटोलचा आमदार असताना शेतपिकास नुकसानदायक असलेल्या जंगली श्वापदांना पारध करण्याची परवानगी मी मिळवून दिली होती. यंदा विधानसभेमध्येसुध्दा शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून होण्याऱ्या त्रासाबद्दल लक्षवेधी लावून हा प्रश्न सोडण्याकरिता प्रयत्न केले.

यानंतर ग्रामपंचायत उमरीतर्फे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या 5 टक्के निधीमधून अपंग लोकांना किराणा किट, ब्लॅंकेट, चादर, बेडशीट इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे, विजय देशमुख, बाबा बुऱ्हान, सरपंच उमरी विशाखाताई लांजेवार, यादवराव ठाकरे, धनराज उईके, मंदार मंगळे वनिताताई खुबाळकर, जितू खुबाळकर, पंकज भोंगाडे, महेश चकोले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन एस. जी. आठवले, वनपरिक्षेत्र अधिकारी खापा, श्री. एस. डी. गडलिंगे, क्षेत्रसहायक खुबाळा, ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे अध्यक्ष नरेंद्र लांजेवार, वनरक्षक पोपट कुकलारे इत्यादी मार्फत करण्यात आले.

120
3649 views