logo

साखर आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे पन्नगेश्वर कारखान्यावर आर आर सी(जप्तीची) ची कार्यवाही करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 15 टक्क

साखर आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे पन्नगेश्वर कारखान्यावर आर आर सी(जप्तीची) ची कार्यवाही करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 15 टक्के व्याजाने थकीत ऊस बिलाची रक्कम तात्काळ मिळावी अन्यथा 6 ऑगस्ट रोजी शेतकरी, कर्मचारी कुटुंबासह कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करणार....... संतोष नागरगोजे
पन्नगेश्वर शुगर मिल्स लिमिटेड या साखर कारखान्याने 2021 -22 व 2022- 23 च्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारीचे व तोड वाहतुकीचेही पैसे थकवले आहेत. ऊस( नियंत्रण)आदेश, 1966 चे कलम 3(3) मधील तरतुदीनुसार हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाचे 14 दिवसात किमान एफआरपीप्रमाणे ऊस किंमत ऊस पुरवठादारांना अदा करणे कारखान्यांना बंधनकारक आहे. तसेच विहित कालावधीत एफ आर पी देयके अदा न केल्यास कलम 3(3A)नुसार विलंब कालावधीकरीता 15 %प्रमाणे व्याज आकारण्याची तरतूद आहे. यानुसार साखर आयुक्त, पुणे यांनी 30 नोव्हेंबर 2023 रोजी थकीत ऊसबिलाच्या व्याजासहित वसुलीसाठी पन्नगेश्वर कारखान्यावर आर आर सी च्या कार्यवाहीचे आदेश मा. जिल्हाधिकारी, लातूर यांना दिले होते. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना तात्काळ थकीत ऊस बिलाचे पैसे देण्यात यावेत या व शेतकरी, कर्मचारी, तोडणी-वाहतूकदार यांच्या विविध मागण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी व कर्मचारी यांना घेऊन मा. जिल्हाधिकारी मॅडम,लातूर यांना निवेदन देण्यात आले.
आर आर सी च्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकऱ्याला अद्यापपर्यंत पैसे मिळाले नाहीत तसेच पन्नगेश्वर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या पगारीचे 12.5 कोटी रुपये थकवले आहेत. तर तोड -वाहतुकीचे 2.5 कोटी रुपये थकवले आहेत. कर्मचाऱ्यांचा 2019 पासून पीएफ भरलेला नाही. तसेच ग्रॅज्युएटीचेही पैसे दिलेले नाहीत. या सर्व मागण्यांसाठी हे सर्वजण कारखान्याकडे गेल्या दोन-तीन वर्षापासून चकरा मारत आहेत. परंतु त्यांना न्याय मिळायला तयार नाहीआणि आता तर पन्नगेश्वर शुगर मिल्स लि. पानगाव या कारखान्याची पाच -सहा महिन्यापूर्वी विक्री झाली आहे. हा कारखाना विमल ऍग्रो फुड्स लिमिटेड या अक्षय मुंदडा यांच्या कंपनीने विकत घेतला आहे असे आम्हाला समजले आहे. कारखाना विकत घेतलेल्या प्रशासनाने शेतकरी, कर्मचारी,तोडणी वाहतूकदार त्यांच्याकडे गेले असता त्यांनी या सर्वांना सांगितले आहे की, कारखान्याचे शेतकऱ्यांचे जुने सर्व शेअर्स रद्द करण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या कोणत्याही थकीत बिलाचा आमचा संबंध नाही. तसेच जुन्या कर्मचाऱ्यापैकी आम्ही कोणालाही कामावर घेणार नाही व कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारीचा व तोड वाहतूकदारीच्या पैशाचाही आमचा संबंध नाही असे सांगण्यात आले आहे.या विरोधात 14 जून ते 30 जून दरम्यान या कारखाण्यासमोर कर्मचाऱ्यांच्या वतीने साखळी उपोषणही करण्यात आले होते. तसेच 11 जुलै 2025 रोजी शेअर्सधारक शेतकरी, कर्मचारी,तोडणी -वाहतूकदार व थकीत ऊस बिल असलेले शेतकरी या सर्वांना सोबत घेऊन मनसेच्या वतीने पन्नगेश्वर कारखान्यावर मोर्चाही काढण्यात आला होता. तसेच मनसेच्या वतीने दिनांक 17/ 7/ 2025 रोजी साखर आयुक्त,पुणे यांना पण यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.परंतु अद्यापपर्यंत पन्नगेश्वर कारखान्याकडून या संदर्भात कसल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. याउलट या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी कारखान्याचे नवीन व्यवस्थापन बीड जिल्ह्यातून गुंडांच्या गाड्या घेऊन कारखान्यावर येत आहे व कर्मचारी व शेतकऱ्यांना ते गुंड लोक धमक्या देत आहेत. त्यामुळे पुढील काळात शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या जीवाला या गुंडांकडून धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या गंभीर बाबीकडे आपण जातीने लक्ष घालून साखर आयुक्त यांच्या आदेशाची अंमलबजावणी करून तात्काळ शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत ऊसबिलाचे पैसे मिळवून द्यावेत तसेच कर्मचारी व तोडनी वाहतूकदार यांच्यावरीलही अन्याय दूर करावा. सर्व 574 कर्मचाऱ्यांना त्यांच्या जुन्या वेतनश्रेणीसहीत कामावर रुजू करून घ्यावे. शेतकऱ्यांचे शेअर्स नियमित करून घेण्यात यावेत. व या सर्वांचे थकीत पैसे दिल्याशिवाय कारखान्यास गाळपाचा परवाना न देण्याची शिफारस साखर आयुक्त पुणे यांना जिल्हाधिकारी यांनी करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी व कर्मचारी यांना घेऊन दिनांक सहा ऑगस्ट 2025 रोजी पन्नगेश्वर कारखान्यासमोर कुटुंबासह ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा मा. जिल्हाधिकारी यांना निवेदणाद्वारे देण्यात आला.
यावेळी मनसे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, शेतकरी सेना प्रदेशउपाध्यक्ष भागवतराव शिंदे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष पांडुरंग कदम, जिल्हा उपाध्यक्ष रवी सूर्यवंशी, मनविसे राज्यउपाध्यक्ष किरण चव्हाण, शहर संघटक बजरंग ठाकूर यांच्यासह कर्मचारी संघटनेचे सोमनाथ फुलारी, गणपत कातकडे, बंडू दहिफळे, आनंत दहिफळे उपस्थित होते

0
0 views