logo

महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणानंतर शिक्षणसेवा अधिकारी संघाचा बेमुदत रजा आंदोलन स्थगित

महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अटक सत्राला सामोरे जाताना अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने सुरू केलेले बेमुदत सामूहिक रजा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व शिक्षण विभागाचे प्रधानसचिव रणजीत सिंह देओल यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकीत विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत मंत्र्यांनी व प्रधानसचिवांनी स्पष्ट केले की, शालार्थ आयडी प्रकरणातील सर्व बोगस प्रकरणांची चौकशी शासनाने गठित केलेल्या विशेष चौकशी समितीकडे वर्ग केली जाईल आणि विना चौकशी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर नियमबाह्य कारवाई केली जाणार नाही.
याशिवाय, शालार्थ प्रकरणात निलंबित झालेले सर्व अधिकारी यांना सेवेत पुनर्स्थापित करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले. संघटनेच्या न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल आणि पोलीस विभागाला शासन स्तरावरून याबाबत निर्देश देण्यात येतील, असेही मंत्र्यांनी सांगितले.
अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने स्पष्ट केले की, यापुढे विना चौकशी नियमबाह्य अटक झाल्यास, कोणतीही पूर्वसूचना न देता स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू केले जाईल. संघटनेच्या वतीने सर्व शिक्षणसेवा अधिकारी कर्मचारी बुधवार, दि. १३ ऑगस्ट २०२५ पासून पूर्ववत कामावर रूजू होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

3
205 views