logo

नीरा भीमा कारखान्याचा ऊस बिलाचा रु. 100 चा हप्ता- भाग्यश्री पाटील

नीरा भीमा कारखान्याचा ऊस बिलाचा रु. 100 चा हप्ता- भाग्यश्री पाटील
-7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
-वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न
इंदापूर : प्रतिनिधी दि.26/9/25
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याकडून मागील सन 2024-25 च्या हंगामामध्ये गाळप झालेल्या ऊसाला दिवाळीपूर्वी प्रति टन रु. 100 प्रमाणे ऊस बिलाचा हप्ता येत्या दि. 10 ऑक्टोबर पूर्वी बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. कारखान्याने आगामी सन 2025-26 च्या गळीत हंगामामध्ये 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.26) दिली.
शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2024-25 ची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा सौं.भाग्यश्री पाटील होत्या.
सौं.भाग्यश्री पाटील पुढे म्हणाल्या, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्थापना केल्यानंतर कारखान्याने गेली 25 वर्षामध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. कारखाना प्रतिदिनी 5 ते 5500 मे. टन क्षमतेने उसाचे गाळप करणार आहे. आपल्या कारखान्यास आजपर्यंत देश व राजपातळीवरील 13 पुरस्कार मिळाले आहेत. पाठीमागील काळात काही अडचणीमुळे उसाच्या पेमेंटला उशीर झालेबद्दल भाग्यश्री पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. कारखान्याच्या कामगारांना दिवाळीनिमित्त एक पगार बोनस दिला जाईल, अशी घोषणाही भाषणामध्ये अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी केली.
यावेळी कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील भाषणात म्हणाले, निरा भिमा कारखान्याची स्थावर मालमत्ता रु. 547 कोटी झाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बैठकीत कर्ज प्रस्ताव मंजूर झालेला असतानाही कारखान्यास मे महिन्यात कर्ज दिले नाही. त्यामुळे ऊस बिल, कामगार पगार देण्यास अडचणी आल्या व विलंब झाला. कारखान्यास कर्ज का दिले नाही हे बँकेस या सभेच्या माध्यमातून सभासद विचारणार आहेत. तसेच कारखान्याकडून आगामी गळीत हंगामामध्ये पुणे जिल्हा बँकेची सोसायटीकडील शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम ऊस बिलातून कपात केली जाणार नाही, असे भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले.
कारखान्याकडून फेब्रुवारी महिन्यात गाळपास येणाऱ्या खोडवा उसास प्रति टन रु. 50 अनुदान दिले जाईल तसेच ऊसाच्या 86032 वाणाच्या लागणीस 30 रुपये अनुदान प्रति टन अनुदान दिले जाईल. तर आडसाली, सुरू, पूर्व हंगामी, निडवा उसासाठी प्रत्येकी 21, 15, 11 हजार रुपये प्रमाणे एकूण 15 पुरस्कार दिले जातील. त्याचप्रमाणे ऊस तोडणी वाहतुकीसाठी सर्वोत्कृष्ट ऊस पुरवठा करणाऱ्या ट्रॅक्टर, बैलगाडी, हार्वेस्टर साठी प्रत्येकी एक पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणाही हर्षवर्धन पाटील यांनी केली. ऊस तोडणी प्रोग्रॅम शेतकीच्या नियमानुसार चालेल, ब्रिक्स प्युरिटी सॅम्पल तपासूनच ऊस तोडणी केली जाईल, त्यात कोणीही हस्तक्षेप करणार नाही, असा कडक इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात दिला आहे.
नीरा भीमा कारखाना बायो-सीएनजी प्रकल्प आगामी काळात उभारणार आहे. तसेच कारखाना स्वखर्चाने कार्यक्षेत्रात 5 गटांमध्ये ए. आय. तंत्रज्ञानावरील ऊस शेतीसाठी हवामान केंद्र उभारणार आहे. प्रत्येक गटामध्ये किमान 100 एकर ऊस शेती ए. आय. ( कृत्रिम गुणवत्ता) तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांनी घेण्याचे आहे. तसेच 10 वर्षासाठी साखर उद्योगाचे धोरण असावे, चालू वर्षी 25 लाख मे. टन साखर निर्यातीस केंद्राने परवानगी द्यावी, असा पाठपुरावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सुरू असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात नमूद केले. नीरा भीमा कारखान्यास चांगल्या गुणवत्तेचा ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचा अध्यक्षपदाच्या माध्यमातून साखरेची एम.एस.पी. प्रति किलो रु.40 करावी व इथेनॉलच्या दरवाढी संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
या सभेत श्रद्धांजली ठराव कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी मांडला. तसेच सध्या दुर्गा नवरात्रोत्सव चालू असल्याने महिला अध्यक्षा म्हणून सौं.भाग्यश्री पाटील यांचा सन्मान शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पवनराजे घोगरे व इतरांनी केला.
अहवाल वाचन कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी केले. या सभेस लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, पदाधिकारी, सभासद, अधिकारी उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी मानले.
•चौकट :-
कारखान्याचा रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम- भाग्यश्री पाटील
------------------------
नीरा भीमाचा चालु होणारा सन 2025-26 चा गळीत हंगाम हा रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम आहे. कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली उसाचे 7 लाख मे. टन गाळप व साखर उतारा 11.50 टक्के पूर्ण करण्याचे संचालक मंडळाचे उद्दिष्ट आहे. आगामी गळीत हंगामामध्ये उसाचे पेमेंट वेळेवरती होईल, त्यामध्ये कधीच विलंब होणार नाही, याची ग्वाही मी देते असे भाग्यश्री पाटील यांनी नमूद केले. तसेच कारखाना ऊस दरात मागे राहणार नाही, अशीही ग्वाहीही त्यांनी दिली.
•चौकट:-
====
निरा भिमाकडे पुढील वर्षी 50 हार्वेस्टर - हर्षवर्धन पाटील
------------------------------------
राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) मार्फत पुढील वर्षी देशात 1 हजार हार्वेस्टर घेणेसाठी 6 टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय सहकार मंत्री अमित शाह यांनी घेतला आहे. या धोरणानुसार पुढील वर्षी नीरा भीमाच्या माध्यमातून 50 हार्वेस्टर घेण्याचे नियोजन असल्याची माहिती एन.सी.डी.सी.नवी दिल्लीचे संचालक असलेले हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली.
•चौकट:-
सलग 5 निवडणुका बिनविरोध होणारा एकमेव कारखाना- हर्षवर्धन पाटील
-------------------------------
निरा भिमा कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास केला आहे. त्यामुळे नुकतीच झालेली कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. नीरा भीमा हा सलग 5 निवडणुका बिनविरोध होणारा एकमेव कारखाना आहे, असे गौरोदगार हर्षवर्धन पाटील काढले. या विश्वासास पात्र राहून कारखान्याचे कामकाज आगामी काळातही केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
____________________________
फोटो:-निरा भिमा कारखान्याच्या 27 व्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील. व्यासपीठावर कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

1
88 views