logo

चिखली (मैना) येथे सेंद्रिय शेती विषयावर शेतकरी चर्चासत्र व परिसंवाद संपन्न....!


काटोल प्रतिनिधी:- न्यूज
काटोल तालुक्यातील चिखली (मैना) येथे एड बाय ट्रेड फाउंडेशन, विजय कॉटन अ‍ॅण्ड फायबर कंपनी लिमिटेड तसेच ॲग्रीजेनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी, काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती व शाश्वत कापूस उत्पादन विषयावर शेतकरी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकल्प व्यवस्थापक मा. मोहनिष गोडबोले सर उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना रीजनरेटिव्ह कॉटन स्टॅंडर्ड (RCS) प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देत सेंद्रिय व पर्यावरणपूरक शेतीचे महत्त्व स्पष्ट केले. मातीची सुपीकता वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे, रासायनिक खतांवरील मात्रा कमी करणे व शाश्वत शेती पद्धती अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला परिसरातील प्रगतशील व अनुभवी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. यामध्ये नथुजी दुपारे, गणपतजी दुपारे, ज्ञानेश्वरजी काळे, तुषार ठाकरे, प्रफुल नारनवरे, प्रेमिलाबाई पाटील, दीपकजी दुपारे, विलासजी नारनवरे, चंद्रशेखरजी गावंडे तसेच ग्रामपंचायत सदस्य सतीशजी काळे यांच्यासह साहिल चौधरी, शैलेश काळे, गजू काळे, सुनील काळे, पियुष काळे यांसारखे अनेक ज्येष्ठ व युवा शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. अनुभवांची देवाणघेवाण होत शेतकऱ्यांमध्ये नव्या शेती तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कृषी विषयक सल्लागार तसेच ए. व्ही. फाउंडेशनचे संचालक विकासजी सोमकुवर यांनी केले. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याची दिशा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

113
2898 views