विश्वशांती महायज्ञ व पट्टाभिषेक रजत महोत्सव भव्य सोहळा यशस्वी करा
खा.अशोकराव चव्हाण यांचे आवाहन.
नांदेड : नवीन नांदेडमधील गोपाळचावडी परिसरात असलेल्या श्री गुरु दशमुखाश्रम, भीमाशंकर नगर येथे येत्या ५ ते १२ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या विश्वशांती महायज्ञ व जगद्गुरु केदार पीठाधीश्वर श्री श्री श्री १००८ भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पट्टाभिषेक रजत महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. मागील दोन महिन्यांपासून या भव्य-दिव्य धार्मिक महोत्सवासाठी युद्धपातळीवर नियोजन करण्यात येत असून, देशभरातून लाखो भाविक नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.या ऐतिहासिक सोहळा यशस्वी करा असे आवाहन या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन, विविध यंत्रणा व स्वयंसेवकांच्या माध्यमातून व्यापक तयारी केली जात आहे.
या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड व दिल्ली येथील मुख्यमंत्र्यांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे असेही त्यांनी सांगितले.दररोज साधारण ५० ते ६० हजार भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे.महोत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद (अन्नदान) दिला जाणार आहे. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत धर्मसभा आयोजित करण्यात येणार असून, विविध संत, महंत व धर्मगुरू यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अनेक धर्मगुरू व मान्यवरांच्या उपस्थितीत पट्टाभिषेक रजत महोत्सव व विश्वशांती महायज्ञाचा समारोप होणार आहे.नांदेडकरांसह देशभरातील भाविकांसाठी हा सोहळा अध्यात्म, श्रद्धा व विश्वशांतीचा संदेश देणारा ठरणार आहे.
विश्वकल्याणासाठी महायज्ञ
या महायज्ञाच्या माध्यमातून जगात शांती, सद्भावना व कल्याण प्रस्थापित व्हावी, हा उद्देश ठेवून जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वशांती महायज्ञ याचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण मानवजातीला शांततेचा मार्ग लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
नियोजनासाठी विविध समित्या
हा भव्य दिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यांतील कार्यकर्त्यांनी स्वतःहून जबाबदार्या स्वीकारल्या आहेत. नांदेड येथील सेवा समिती भाविकांच्या निवास, भोजन, वाहतूक, आरोग्य व सुरक्षा व्यवस्थेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
*भव्य शोभायात्रा, अन्नदान व धर्मसभा*.
5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता केदारेश्वर सत्संग मंडळ, आनंदनगर येथून नवा मोंढा - आयटीआय वजीराबाद - शिवाजी पुतळा - चिखलवाडी - गुरुद्वारा चौक - जुना मोंढा मार्गे भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. या शोभायात्रेत अश्व, हत्ती, फटाके, कुंभ-कलश, आरती, लेझीम पथक, भजनी मंडळ यांचा समावेश असेल. जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे असेही स्वागताध्यक्ष खा.चव्हाण यांनी यावेळी सांगितले