शिवराय हे संपूर्ण हिंदुस्थानच्या व महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत समाजसेविका पुजा धनंजय जाधव
आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा व कार्याचा कोणताही अवमान होणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. शिवराय हे संपूर्ण हिंदुस्थानच्या व महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत.
अलीकडे काही विधानांमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याची भावना व्यक्त होत आहे. याच्या निषेधार्थ पुण्यात शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पुणे महानगरपालिका महापौर सौ. मनीषा नागपुरे ताई व शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वात पार पडले. मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदवून आपल्या भावना व्यक्त केल्या.
मात्र आंदोलन सुरू असताना विरोधी विचारसरणीच्या काही कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेत एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. लोकशाही व्यवस्थेत मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे; परंतु हिंसक मार्गाचा अवलंब करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवर हल्ला करणे, हे लोकशाहीच्या मूल्यांना धरून नाही.
इतिहासातील कोणत्याही व्यक्तिमत्त्वाबाबत बोलताना संतुलित आणि आदरयुक्त भूमिका ठेवणे आवश्यक आहे. कोणाच्याही गौरवासाठी दुसऱ्या महान व्यक्तिमत्त्वाचा अवमान होऊ नये, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
शिवरायांविषयी आदर, अभिमान आणि कृतज्ञता ही प्रत्येकाच्या मनात आहे आणि राहील. त्यांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा आणि स्वराज्याच्या विचारांचा सन्मान राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.