
सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे मोसम नदी स्वच्छतेबाबत १७ वर्षांपासून लढा.... महिलांनी भरली खणा-नारळाची ओटी...मालेगावातील मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी; अंगाला गेरू फासत केले आंदोलन मालेगावकरांच्या संतापाचा उद्रेक : प्रांताधिकाऱ्यांसह पोलिसांकडून मनधरणी... जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे...
मालेगाव येथील मोक्षिणी अर्थात मोसम नदीपात्रात शनिवारी (दि. ७) रक्तमिश्रित पाणी वाहू लागल्याने मालेगाव नागरी सुविधा समितीने आंदोलन छेडत महापालिकेसह जिल्हा प्रशासनाचे दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येकडे लक्ष वेधले. संतप्त महिलांनी नदीचे पावित्र्य राखण्यासाठी खणानारळाने नदीची ओटी भरत दुग्धाभिषेकही केला तर नागरिकांनी अंगाला गेरू फासत निषेध नोंदवला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यावर उपाययोजनेचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.शहरातील कत्तलखान्यांतून ड्रेनेजद्वारे मौसम नदीत रक्तमिश्रित पाणी येत असल्याने नदीच्या पावित्र्यासह नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालेला आहे. याबाबत मालेगाव नागरी सुविधा समितीकडून गेल्या काही वर्षापासून सातत्याने आंदोलने छेडली जात आहेत. परंतु, त्याकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून डोळेझाक केली जाते. आताही मौसम नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रक्तमिश्रित पाणी आल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक बघायला मिळाला. मोसम नदीपात्रातील प्रदूषणाबद्दल नागरिक वारंवार आंदोलने करत आले आहेत. नदीपात्रात सांडपाणी सोडले जात असल्याने दुर्गंधी पसरून नदीचे अस्तित्वच धोक्यात येऊ पाहत आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे दर्शन त्यातून घडत असते.नदीच्या स्वच्छतेबाबत मालेगाव नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे गेल्या १७ वर्षांपासून लढा देत आहेत. परंतु, त्याची दखल घेतली जात नाही. शनिवारी (दि. ७) मोसम नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर स्क्तमिश्रित पाणी दिसू लागल्याने नागरी सुविधा समितीने महापालिकेच्या निषेधार्थ येथील सांडवा पुलावर अंगाला गेरू फासून आंदोलनाला सुरुवात केली.सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाची चर्चा शहरात पसरून मनपा प्रशासनासह पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांनी आंदोलनस्थळी भेट देत बोरसे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी शहरातील आंदोलनस्थळी यावे व मनपा आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, असा आग्रह कायम ठेवला.या आंदोलनाची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन बोरसे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी याठिकाणी भेट देऊन बोरसे यांच्याशी चर्चा केली. यावेळी मनपा उपायुक्त गणेश शिंदे हेदेखील उपस्थित होते.यावेळी प्रांताधिकारी सदगीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्क केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या चर्वेत बोरसे यांना पुढील आठवड्यात एक बैठक घेण्याचे तसेच आयुक्तांवर या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बोरसे यांनी आंदोलन स्थगित केले. एकीकडे आंदोलन सुरू असतानाच संगमेश्वर भागातील काही महिला या नदीच्या पाक्रियासाठी पुढे सरसावल्या. त्यांनी नदीची विधिवत पूजा करून ओटी भरली. त्यानंतर मृत पावलेल्या सर्व जनावरांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी प्रार्थना करण्यात येऊन नदीला पवित्र असे दूध अर्पण करण्यात आले.
मालेगाव येथील मोसम नदीच्या प्रदूषणाबद्दल काही समाजसेवी संघटनांनी दूरध्वनीवर संपर्क साधत तक्रार केली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी, मालेगाव महापालिकेला सूचना दिली होती. तरीही त्या सूचनेप्रमाणे काम झाले नाही, असे दिसून आले तर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल.-जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक