पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडीत तीन दिवसीय भव्य महोत्सव.
चोंडी (ता. जामखेड) : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे दिनांक २९, ३० व ३१ मे २०२६ दरम्यान तीन दिवसीय भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास सर्व अहिल्याभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले आहे.
या महोत्सवाला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री अतुल सावे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या अटीवर या महोत्सवास परवानगी दिली आहे.
दीपमहोत्सवाने प्रारंभ
शुक्रवार, २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून भामाबाई शंकरराव शिंदे यांच्या हस्ते मंदिरावरील विद्युत रोषणाई व भव्य दीपमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
कवी संमेलन व भव्य ड्रोन शो
शनिवार, ३० मे रोजी रात्री ७.३० वाजता भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये युगकवी डॉ. कुमार विश्वास, अभिनेत्री गिरिजा ओक, डॉ. भुवन मोहिनी, साक्षी तिवारी, शिखा अवधेश, श्रद्धा शौर्य, सान्या राय आणि नेहा गोडघाटे हे कवी व साहित्यिक सहभागी होणार आहेत.
यानंतर रात्री ११ वाजता अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर आधारित आकर्षक ड्रोन शो सादर करण्यात येणार असून तो सुमारे १० किलोमीटर अंतरापर्यंत पाहता येणार आहे. मध्यरात्री १२ वाजता भव्य फटाक्यांची आतषबाजी होणार आहे.
मुख्य जयंती सोहळा ३१ मे रोजी
रविवार, ३१ मे रोजी सकाळी ८ वाजता राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत अहिल्येश्वर मंदिरात महाअभिषेक संपन्न होईल. सकाळी ९ वाजल्यापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चोंडी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मुख्य जयंती सोहळा व अभिवादन सभा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
अहिल्यादेवींच्या विचारांचा व कार्याचा गौरव करणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यास नागरिकांनी व अहिल्याभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.